यमुनापर्यटन कादंबरी (Yamuna Paryatan Kadambari) आपल्याला भारतीय आणि मराठी वाङमयाची अद्भुत ओळख करून देते. मराठी वाङमयेतिहासातील गेल्या 150 वर्षांतील महत्त्वाच्या पुस्तकांच्या यादीत ‘यमुना पर्यटन अथवा हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरुपण’ या बाबा पदमनजी यांच्या छोटेखानी पुस्तकाचा अग्रक्रमाने समावेश करावा लागेल. सन 1857 मध्ये ही कादंबरी प्रथम प्रकाशित झाली. अलीकडे (2005 मध्ये) तिची नवी आवृत्तीही प्रकाशित झाली आहे. वाङमयेतिहासात जरी या पुस्तकाला मराठी कादंबरीचा प्रारंभबिंदू मानले जात असले तरी, ते कादंबरी स्वरूपाचे लेखन मानता येईल किंवा कसे हा मुद्दा विवाद्य ठरला आहे.
कादंबरीतील वास्तववाद
या कादंबरीत प्रतिबिंबित झालेला वास्तववाद एका बाजूने उघडा-बोडका, तर दुसऱ्या बाजूने प्रचारपीडित आहे. कारण विधवाची दुःखे उघड करणे किंवा विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणे हे निमित्त घेऊन ख्रिस्ती धर्माची महती येनकेन प्रकारेण त्यात पटविली आहे. तसे करताना त्यात अतिरंजितपणा व भडकपणा शिरला आहे.